नवीन पाईपलाईन पुन्हा फुटली; सकाळपासून गळती सुरू, सैनिक कॉलनी व गायत्री नगर परिसरातील नागरिक त्रस्त
बुलडाणा : शहरातील मुठ्ठे लेआऊट परिसरातील तानाजी चौकात नव्याने टाकण्यात आलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनला पुन्हा गळती लागल्याने शनिवारी सकाळपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. नगरपालिकेच्या हलगर्जी कारभारामुळे ही समस्या वारंवार उद्भवत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पाईपलाईन आतापर्यंत तब्बल २२ वेळा दुरुस्त करण्यात आली आहे. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे गळतीची समस्या कायम असून प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
सकाळी सुमारे सहा वाजल्यापासून सुरू झालेली पाण्याची गळती दुपारपर्यंतही सुरूच होती. गळतीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून ते सैनिक कॉलनी व गायत्री नगर परिसरापर्यंत वाहत जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला असून पादचारी व स्थानिक नागरिकांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांनी तातडीने गळती दुरुस्त करून संबंधित कामाची चौकशी करावी, तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पाणीटंचाईच्या काळात अशा प्रकारे हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जाणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.






